



गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क
आष्टी (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील दळणवळणाचे मुख्य रस्ते दुरुस्ती करावेत, शेतक-यांच्या मागण्यांची पूर्ण कराव्यात, या व इतर मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने आज, 19 सप्टेंबर रोजी चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सकाळी 11 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मागण्यांचे निवेदन तहसीलदार, एसडीओ, साबां विभागास सादर करण्यात आले.
आंदोलनात वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन बारसिंगे, महिला नेत्या मालाबाई भजगवळी, संघटक भिमराव शेंडे, जिल्हा महासचिव योगेंद्र बांगरे, रामरतन मेश्राम, देवानंद दुर्गे, जिल्हा उपाध्यक्ष विलास केळझरकर, तालुका प्रभारी जया रामटेके, महिला अध्यक्षा प्रज्ञा निमगडे, छोटू दुर्गे, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान आष्टी-गोंडपिपरी, आष्टी-आलापल्ली व आष्टी-चामोर्शी या तीनही मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प पडली होती.
प्रमुख मागण्या खालील प्रमाणे –
आष्टी-आलापल्ली-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गाचे थंडबस्त्यात असलेले निर्माणधीन काम त्वरित सुरु करावे, चामोर्शी-हरणघाट रस्त्याचे काम त्वरित सुरु करावे, चामोर्शी तालुक्यातील शेतक-यांच्या शेतजमिनी जोरजबरदस्तीने अधिग्रहण करून बळकाविण्याचे प्रकार शासन व कंपन्यांनी थांबवावे, ज्या शेतक-यांच्या शेतजमिनी शासन व कंपन्यांनी जबरदस्तीने अधिग्रहण करून बळकाविण्यात आल्या आहेत, त्या शेतक-यांच्या कुटूंबातील एका सदस्याला विना अट शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, वनहक्काचे पट्टे त्वरित द्यावे आदी मागण्या आंदोलनादरम्यान करण्यात आल्या.