



गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क
लगाम (प्रतिनिधी)
जंगलातील वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे धाव घेत आहेत. रविवारी, (दि.25) मे रोजी सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास चितळ गावशेजारी येताच गावठी कुत्र्यांनी त्याचेवर हल्ला चढवित ठार केल्याची घटना तालुक्यातील राजपूर पॅच येथे उघडकीस आली आहे. वनविभागाचे पथक तसेच पशुवैद्यकीय अधिकारी वेळेवर घटनास्थळी न पोहचल्याने चितळाचा जीव गेल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे.
अहेरी तालुक्यात राजपूर पॅच येथे रविवारी, सकाळच्या सुमारास जंगलातील चितळ्याला गावठी कुत्र्याने जखमी केल्याने चितळ गावाच्या दिशेने धाऊ लागले. जखमी अवस्थेत हरीण गावातील प्रदीप निकोडे यांच्या घराशेजारी आले. निकोडे यांनी चितळाची गावठी कुत्र्यांकडून सुटका केली. मात्र कुत्र्यांच्या चाव्यामुळे चितळ गंभीर जखमी झाले होते. याची माहिती ग्रामस्थांना कळताच बघ्यांची एकच गर्दी उसळली. याची माहिती वनविभाग व पशुवैद्यकीय विभागाला देण्यात आली. मात्र, सदर दोन्ही पथक वेळेवर घटनास्थळी न पोहचल्याने काही क्षणातच चितळाने प्राण सोडला. वनविभाग व पशुवैद्यकीय अधिका-यांच्या निष्काळजीपणामुळे चितळाचा जीव गेल्याचा आरोप करीत नागरिकांनी प्रशासनाप्ती तीव्र रोष व्यक्त केला. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी मद्देलवार, वनरक्षक लेखामी, वनमजूर शंकर रामगिरीरकर, सडमेक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल गुरनुले यांच्या उपस्थितीत चितळाचा अंत्यविधी पार पाडण्यात आला. यावेळी संजय मोहुर्ले, महेश बाकीवार, विस्तारी गंगाधरीवार, ज्ञानेश्वर कैलास, आदे पुलीवार, महेश गंगाधरवार, श्रीनिवास अवनुरवार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.