



गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
गडचिरोली(प्रतिनिधी)
गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज, 27 मे रोजी मुंबई येथे यशवंत पंचायतराज अभियान 2023-24 अंतर्गत अमरावती जिल्हा परिषदेसाठी जाहीर झालेला दुसऱ्या क्रमांकाचा राज्यस्तरीय पुरस्कार स्वीकारला.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, 20 लाख रुपयांचा धनादेश व स्मृतिचिन्ह असा हा गौरवशाली पुरस्कार प्रदान करण्यात आला. जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पंडा यांच्या कार्यकाळात म्हणजेच सन 2022-23 या आर्थिक वर्षात अमरावती जिल्हा परिषदेने केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती जिल्हा परिषदेने शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि इतर पायाभूत सुविधांच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना यशस्वीपणे राबवल्या. ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे जिल्ह्याने विविध क्षेत्रांमध्ये प्रशंसनीय प्रगती साधली. पंडा यांचे प्रशासकीय कौशल्य आणि लोककल्याणकारी दृष्टिकोन यामुळे जिल्हा परिषदेच्या कारभारात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढली. त्यांच्या नेतृत्वाखालील कार्यामुळे अमरावती जिल्हा परिषदेला हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला. यावेळी ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम, ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती तसेच राज्यातील पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांचे मुख्य अधिकारी तसेच ग्राम विकास विभागाचे पुरस्कारप्राप्त अधिकारी आणि कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. राज्यस्तरावरील उत्कृष्ट जिल्हा परिषद पुरस्कार अनुक्रमे वर्धा, अमरावती व सोलापूर जिल्हा परिषदांना देण्यात आले. तर राज्यस्तरावरील उत्कृष्ट राज्यस्तरीय पंचायत समिती पुरस्कार कळमेश्वर, जिल्हा नागपूर, जामनेर जिल्हा जळगाव व शिराळा जिल्हा सांगली या पंचायत समित्यांना देण्यात आले.