



गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क :
चंद्रपूर(प्रतिनिधी )जिल्ह्यातील कोरपणा तालुक्यातील वर्धा नदीच्या किनारी असलेल्या भोयेगाव जवळ शेती आणि जंगल परिसरात 25 हजार वर्षादरम्यानच्या मध्यपाषाण (Mesolithic) युगातील आदिमानवांची अवजारे येथील भूशास्त्र आणि पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी शोधून काढली आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशी अवजारे मिळाली असली तरी कोरपणा परिसरात प्रथमच अशाप्रकारची मध्याश्मयुगीन अवजारे मिळाल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेतून दिली.
भोयेगाव येथे आढळलेली ही अवजारे आर्कीयन काळातील रुपांतरीत खडकापासून बनविलेली असून त्यात अर्ध मौल्यवान समजल्या जाणाऱ्या जास्पर ,अगेट,क्वार्ट्झ ह्या खडकांचा समावेश आहे. विदर्भ आणि विशेषता चंद्रपूर जिल्हा हा पाषांनयुगात विशेषता हिमयुगात जास्त लोकसंख्या असलेला प्रदेश होता हे अनेक ठिकाणी आढळलेल्या अवजारावरून लक्षात येते. अश्मयुगात मानव नदीकिनारी राहत असे. भोयेगाव परिसरात नदीकिनारी आढळणारे खडक हे १५० कोटी वर्षाच्या आर्कीयन काळातील असून ते रुपान्तरीत प्रकारात मोडतात .हे खडक ह्या परिसरात हिमयुगात वाहून आलेले,गाल मिश्रित अल्लूवियम, असून त्यात लहान गोल खडक आढळतात. हे खडक ४०००० ते २५००० वर्षादरम्यान वाहात आलेले आहेत ह्यात क्वार्टझाईट,अगेट,क्वार्ट्झ,जास्पर हे खडक अतिशय टणक आणि मजबूत असून अश्म अवजारांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत .म्हणूनच अश्मयुगातील लोकांना क्वार्टझाईट मँन असे म्हटल्या गेले. भोयेगाव जवळील अवजारात पूर्व पाषाण युगात वापरात असलेली खूप मोठ्या आकाराचचे अवजारे नाहीत तर लहान आकाराची हात कुर्हाड,आणि ब्लेड्स जास्त प्रमाणात आढळतात.
ह्या पूर्वी प्रा सुरेश चोपणे ह्यांनी चंद्रपूर तालुक्यातील वर्धा नदीकिनारी हडस्ती येथे २००७ मध्ये , चंद्रपूर जवळ झरपट नदीकिनारी (पापामिया) येथे १९९७ मध्ये तसेच इरई नदीजवळ दाताळा येथे 2011 मध्ये ,पोभुर्णा जवळ वैनगंगा नदीकिनारी २००८ मध्ये अशी १५ ठिकाणी त्यांनी अश्मयुगीन अवजारे शोधली आहेत. २ लाख ते ५ हजार वर्षे कालखंडात अश्म युगाचे पुराश्म युग,मध्याश्म युग आणि नवाश्म युग असे प्रामुख्याने ३ भाग पाडण्यात आले असून चंद्रपूर जिल्ह्यात तीनही कालखंडात मानव वास्तव्यास होता.
प्राचीन मानव हा भटकंती करीत असला तरी तो हा बारमाही नदी किंवा नाल्याच्या जवळ काही काळ राहत असे. ह्या परिसरात गुहा नसल्याने ते झाडाच्या आसऱ्याने उघड्यावर जीवन जगात असे.`अवजारे बनविणे आणि अन्नाच्या शोधात भटकणे असा त्यांचा दिनक्रम असे..ज्या ठिकाणी अवजारे बनविण्यासाठी योग्य खडक असेल आणि अन्न उपलब्द असेल तेथे काही वर्षे राहणे आणि पुढे योग्य ठिकाणी जाणे असे त्यांचे जीवन होते. खर तर बहुजन समाज वंशज- आज जिल्ह्यात जो आदिवासी आणि बहुजन समाज आहे ते अश्मयुगीन मानावांचेच वंशज आहेत. आदिमानवामध्ये सुधा वांशिक विभिन्नता होती हे त्यांच्या आजच्या चेहरेपटीवरून लक्षात येते . पुढे वांशिक सरमिसळ झाली आणि मानव विविध जातीत विभागलेला आजचा बहुजन समाज निर्माण झाला. पुढे नवाश्म युगात आपण शेती करायला शिकलो आणि गावे करून स्थाईक झालो.