



गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
अहेरी (प्रतिनिधी)
अहेरी उपविभागांतर्गत येत असलेल्या अहेरी व पेरमिली परिसरातील वीज समस्या दूर करण्यासाठी शासनाच्या प्राप्त निधीअंतर्गत अहेरी व पेरमिली येथे विद्यूत उपकेंद्र नवीन पुर्नबांधणीचे काम सुरु आहे. मात्र, संबंधित कंत्राटदाराच्या कामातील अनियमितता व बेजबाबदार कारभारामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच सदर बांधकामात अत्यंत निकृष्ट साहित्याचा वापर होत असल्याने या कामाची सखोल चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी आ. धर्मरावबाबा आत्राम यांचेकडे निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, अहेरी उपविभागांतर्गत येत असलेल्या पेरमिली व अहेरी येथे नवीन विद्यूत उपकेंद्र पुर्नबांधणीचे काम सुरु आहे. या कामाकरिता संबंधित कंत्राटदाराने चुकीच्या पद्धतीने पाईपलाईन खोदकाम केले आहे. रस्त्यालगत नाली खोदुन येथे कोणत्याही प्रकारची दबाई व रीलिंग करण्यात आलेली नाही. परिणामी नागरिकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना मार्गक्रमण करतांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. खोदलेल्या नालीमुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. अहेरी येथील विद्यूत उपकेंद्राच्या कामादरम्यान करण्यात खोदकामादरम्यान अनेक ठिकाणी जलवाहिनी सुद्धा फुटल्या गेली असल्याने अहेरी, नागेपल्ली तसेच आलापल्ली येथील पाणी पुरवठा बंद पडला आहे. पेरमिली येथे 39 कोटी रुपयाचे नविन उपकेंद्राचे बांधकाम सुरु आहे. या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले आहे. तसेच अहेरीतही अंदाजीत 7 ते 9 कोटी निधी अंतर्गत होणारे काम निकृष्ट दर्जाचे सुरु आहे. संबंधित कंत्राटदाराद्वारे शासकीय नियमानुसार काम न करता निकृष्ट साहित्य वापरासह कामात अनियमिततेमुळे नागरिकांमध्ये ओरड होत आहे. त्यामुळे सदर कामाची सखोल चौकशी करुन संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संतोष ताटीकोंडावार यांनी आ. धर्मरावबाबा आत्राम यांचेकडे निवेदनातून केली आहे.